img

पर्यटन

पाटबंधारे प्रकल्प, महत्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे – जिल्हा नागपूर

शून्य मैलाचा दगड (Zero Milestone)

नागपूरच्या भौगोलिक स्थानामुळे देशांतर्गत सर्व अंतराचे मोजमाप येथील सिव्हिल लाईन्स या भागात असलेल्या शून्य मैलाच्या दगडापासून (zero milestone) केले जाते. झिरो माइल स्टोन हे महाराष्ट्रातील नागपूर येथे १९०७ मध्ये ग्रेट ट्रिगोनोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडिया दरम्यान ब्रिटिशांनी बांधलेले स्मारक आहे. झिरो माईल स्टोनमध्ये वाळूचा खडक आणि GTS स्टँडर्ड बेंच मार्कचे प्रतिनिधित्व करणारा दुसरा छोटा दगड आणि नंतर जोडलेले चार स्टुको घोडे यांचा समावेश आहे. स्तंभाच्या शिखराची उंची सरासरी समुद्रसपाटीपासून 1020.171 फूट आहे. ब्रिटिशांनी हा बिंदू वापरण्यासाठी झिरो माईल स्टोन उभारला होता याचा कोणताही पडताळणीयोग्य पुरावा नाही.

सातपुडा बॉटनिकल गार्डन

नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन हे अतिशय अद्भूत गार्डन असून, हजारो लोकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरले आहे. सिटी सेंटरच्या ईशान्येकडे असलेल्या या सातपुडा बॉटनिकल गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास करणा-यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. कारण, येथे विविध वनस्पतींची महत्त्वूपर्ण माहिती उपलब्ध आहे. सातपुडा गार्डन आणि आसपासच्या परिसराच्या आल्हाददायक वातावरणात पक्षी तर आहेतच, तरुण जोडपीही वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येथे येत असतात.

फुटाळा तलाव

फुटाळा तलाव हा नागपूरच्या पश्चिम भागात असणारा एक तलाव आहे. यास तेलंगखेडी तलाव असेही म्हणतात. याची बांधणी भोसले राजवटीदरम्यान झाली.

उपराजधानीतील सर्वात सुंदर फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम नुकतेच पुर्ण करण्यात आलेले आहे. तलावात लोकांच्या मनोरंजनासाठी म्युझिकल फाऊंटेन लावण्यात आलेले आहे. तसेच पर्यटकांना परिसरात बसून याचा आनंद घेण्याकरीता विशेष गॅलरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

खिंडसी तलाव

रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे. नागपूरपासून 53 किलोमीटर आणि रामटेकपासून 3.5 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. वैदर्भिय जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ आकर्षक आणि आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोवींग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी पार्कही आहे. तर साहसी उपक्रम करणा-या मोठ्यांसाठी जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे.

खेकरा नाला

नागपूरपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या खाप्रा येथील खेकरा नाला हे नैसर्गिक सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खापाजवळील छिंदवाडा मार्गावर ते आहे. साहसी उपक्रम करणा-यांसाठी विशेषत: पर्वतरोहकांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, खेकरा नाला धरणाच्या सभोवताल असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे होय. हे सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील पर्यटक येथे येत असतात. यामुळेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी येथे लॉंजिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

दीक्षाभूमी

जगभरातील बौद्ध बांधवांचे हे अतिशय पवित्र आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे 3 लाख 80 हजार अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोद्ध धम्म स्वीकारला होता. त्यांनी स्वीकारलेली ही दीक्षा आजही देशातील असंख्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे. भारतातील भीमबांधवांसाठी दीक्षाभूमी हे श्रद्धास्थळच आहे. प्रत्येक वर्षी अशोक विजया दशमी आणि 14 ऑक्टोबर रोजी (बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारली तो दिवस) येथे लाखो बौद्ध बांधव भेट देत असतात. या जागेवर भव्य स्तूप उभारण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर असे वास्तूशिल्प आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे संपूर्ण जगात दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. भारतातील पर्यटकांचेही हे मुख्य केंद्र आहे.

ड्रॅगन पॅलेस टेंपल

नागपूरजवळील कामठी येथे असलेले ड्रॅगन पॅलेस हे बौद्धांचे विहार असून, तथागत बुद्धाला ते अर्पण करण्यात आले आहे. अद्वितीय कलाकृतीचे हे एक सर्वोत्तम प्रतीक आहे. पर्यटकांचे आकर्षण ठरलेले नागपूरजवळच्या कामठी येथील हे सर्वात लोकप्रिय स्थळ आहे. जपानच्या ओगावा सोसायटीच्या मॅडम नोरिको ओगावा यांनी ड्रॅगन पॅलेस विहारच्या बांधकामात मोठे आर्थिक योगदान दिले असल्याने नागपूर जिल्हा हा भारत—जपान मैत्रीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. नागपूरचे लोटस मंदिर अशीही या विहारची ओळख आहे. हिरवळ, रंगिबेरंगी फुलांचा बगिचा यामुळे हा परिसर सुशोभित आणि आल्हाददायक झालेला आहे. या विहाराच्या भितींना पांढरा शुभ्र रंग देण्यात आला असून, तो शांतता, समानता आणि धर्माचे प्रतीक आहे.

रामटेक - गड मंदिर (राम मंदिर), श्री शांतीनाथ जैन मंदिर व रामधाम

रामटेक येथे भगवान श्रीरामाचे ऐतिहासिक मंदिर आहे. वनवासाच्या काळात श्रीरामांनी ज्या-ज्या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली होती, त्यातील एक स्थळ म्हणजे रामटेक आहे, असे म्हटले आहे. रामटेकच्या जवळच महान अगस्त्य ऋषींचे आश्रम होते, अशीही आख्यायिका आहे. या आश्रमात ऋषी तप करायचे आणि राक्षस त्यांची तपश्चर्या उद्ध्वस्त करायचे. भगवान श्रीरामांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संपूर्ण श्रृष्टी राक्षसांपासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली. महान कवी कालिदास यांच्या वास्तव्यामुळेही या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. रामटेकच्या टेकडीवर बसूनच कालिदासांनी ‘मेघदूतम’ लिहिले आहे. जगातील सर्वात मोठे 350 फूट लांब ‘ॐ’ हे रामधामचे प्रमुख वैशिष्ट आहे. या ॐ च्या आत चित्रस्वरुपात रामायण पाहायला मिळते तर बाहेर कृष्णलीलाचे वर्णन आणि हनुमान, साईबाबा व गजानन महाराजाची मूर्ती आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्प

पेंच व्याघ्र प्रकल्प हा नागपूर जिल्ह्यातील रामटेक, परसोनी आणि सावनेर तालुक्यात पसरलेला आहे. हे भारतातील 25 वे व्याघ्र प्रकल्प आहे. पेंच व्याघ्र अभयारण्य (PTR) ज्याला त्याचे नाव त्याच्या जीवनरेषेवरून मिळाले आहे - पेंच नदी. पेंच व्याघ्र प्रकल्प हा मध्य भारतात आढळणाऱ्या वाघ, बिबट्या, आळशी अस्वल, भारतीय गौर, जंगली कुत्रा, लांडगा इत्यादींसह जवळजवळ सर्व प्रमुख फुलांच्या आणि प्राण्यांच्या प्रजातींचे उत्तम निवासस्थान आहे. कान्हा, पेंच (M.P), ताडोबा अंधारी, नवेगाव-नागझिरा आणि बोर व्याघ्र प्रकल्पांशी चांगली कनेक्टिव्हिटी आहे. पेंच नदी आरक्षित क्षेत्राला जवळजवळ दोन समान भागांमध्ये विभागते. पेंच नदीवर बांधलेला तोतलाडोह जलाशय व्याघ्र प्रकल्पातील वन्य जीवन समृद्ध आणि टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. पीटीआर प्रवास करण्यासाठी सर्वोत्तम हंगाम म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा. पर्यटक 6 पर्यटक सफारी गेट्सद्वारे पेंच व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करू शकतात. उदा. NH 44 वरून सिल्लारी, चोरबाहुली, खुरासपार आणि परसोनी आणि सावनेर येथून कोलितमारा, खुबाला (सालेघाट) आणि सुरेवानी (नागलवाडी).

उमरेड कर्हांडला वन्यजीव अभयारण्य

उमरेड कर्हांडला अभयारण्य महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पौनी तहसील आणि उमरेड, कुही आणि महाराष्ट्रातील भिवापूर तालुक्यात पसरलेले आहे.वैनगंगा नदी आणि गोसेखुर्द धरण अभयारण्याच्या ईशान्य सीमेवर आहेत तर राज्य महामार्ग 9 आणि भिवापूर शहर दक्षिणेला लागून आहेत. उत्तर-पश्चिम समोर 600-800 मीटर उंच टेकड्यांची 10 किमी लांबीची श्रेणी आहे. 2013 मध्ये या अभयारण्याचे उद्घाटन झाले. सदर अभयारण्याने नागझिरा वन्यजीव अभयारण्यातून प्रसिद्ध नर वाघ 'जय' स्थलांतरित केल्यावर माध्यम आणि पर्यटकांचे व्यापक लक्ष वेधून घेतले. टायगर जयने येथे येण्यासाठी 130 किमीहून अधिक पायी प्रवास केला. जय हा वन्यजीव संशोधक, वन्यजीव छायाचित्रकार आणि वनविभागाच्या अधिका-यांचे आवडता होता. त्यांच्या स्थलांतराने त्यांचे लक्ष उमरेड कर्हांडला अभयारण्याकडे वळवले. भारतातील सर्वात मोठा आणि देखणा वाघ म्हणून जयची खूप प्रशंसा केली जाते. तो आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांनी उमरेड कर्हांडला वन्यजीव अभयारण्यात जगभरातून पर्यटकांना आकर्षित के्ले. अनेक प्रसिद्ध भारतीय प्रजाती येथे राहतात. जसे की - बंगाल टायगर, इंडियन बिबट्या, ब्लू बुल, बार्किंग डीअर, वाइल्ड बोअर आणि स्लॉथ बेअर.2014 च्या जनगणनेनुसार, अभयारण्यात 11 वाघ आणि 6 बिबटे होते.

पाटबंधारे प्रकल्प, महत्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे – जिल्हा अकोला

सालासर बालाजी मंदिर

सालासर मंदिराची स्थापना गंगा नगर अकोला येथे वर्ष २०१४ मध्ये झाली. येथे श्री हनुमानजी, श्री राम दरबार, श्री राधाकृष्ण आणि श्री शिव परिवार यांची मूर्ती आहेत. मंदिराचा परिसर २ लाख चौ.फूट असून त्यामध्ये बगीचा आहे.

काटेपुर्णा अभयारण्य

सदर अभयारण्य विदर्भातील अकोला जिल्ह्यात स्थित आहे. हे अकोलाच्या जवळ असून मुख्यतः काटेपूर्णा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात आहे. हे जलाशय मुख्यत्वे पाणथळ पक्ष्यांना आकर्षित करते.

येथील झुडुपे ही दक्षिणी उष्ण व कोरडे पानझडी वन असून येथे वनस्पतींच्या ११५ प्रजाती आढळतात. मुख्य वृक्ष प्रजातींमध्ये बेहडा, धावडा, मोह, तेंदूपान, खैर, सळई, ओला, तेउदे इत्यादी येथे बहुसंख्य प्रमाणात आढळतात. अभयारण्य चौशिंगी काळवीट आणि बार्किंग हरणासाठी प्रसिद्ध असून इतर प्राण्यांमध्ये काळे हरीण, लांडगा, बिबट्या, तरस, रानडुक्कर, नीलगाय, ससा, जंगली मांजर, माकड ह्यांचा समावेश होतो, सामान्य गवताळ प्रदेश आणि पाणथळ पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे बघायला मिळतात. मोर आणि लांडोर येथे पर्यटकांकडून सामान्यतः बघितले जातात. काटेपूर्णा जलाशय स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना आकर्षित करते.

नरनाळा किल्ला

अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासून गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.

गड जमीनीपासून ३१६१ फुट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकर असून गडाच्या कोटाची (तटबंदी) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.

गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

बाळापुर किल्ला

इतिहास कालीन कालखंडात विदर्भाची ओळख वऱ्हाड प्रांत म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या प्रांताबाबत ऐतिहासिक माहिती सुद्धा मिळते. या जिल्ह्याच्या भागात पूर्वी अनेक शासकांनी शासन केलं होते अशी इतिहास कालीन माहिती मिळते. याबाबत सांगायचं म्हणजे मन आणि म्हैस (महिषी) नद्यांच्या संगमावर वसलेला बाळापुर येथील पुरातनकालीन किल्ला व या किल्ल्याच्या शेजारी मन आणि म्हैस नदीच्या तीरावर वसलेले बाळादेवीचे मंदिर. देवीच्या नावावरूनच गावाचे नाव बाळापुर असे पडले.

या किल्ल्याबाबत मिळालेल्या ऐतिहासिक माहितीनुसार, इ.स. १७२१ साली मुघल शासक औरंगजेब यांचा दुसरा मुलगा शहजादा आजमशहा यांनी या किल्ल्याचा पाया रचला असून त्यांचे पूर्ण बांधकाम अचलपूर येथील नवाब इस्माईल खान यांनी इ.स. १७५७ साली पूर्ण केले होते.

मन आणि म्हैस नद्यांच्या मध्यभागी असलेल्या किल्ल्याला दुहेरी बंधनाची भक्कम स्वरुपाची तटबंदी असून, जागोजागी बुलंद आणि उंच बुरुजाची बांधणी करण्यात आली आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेश द्वार उत्तर देशेला असून, या प्रवेश मार्गात तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरसाकृती असून त्याचे बांधकाम भक्कम बुरुजामध्ये केले गेले आहे.

या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यास दुसरा दरवाजा पडतो तो दरवाजा पश्चिम मुखी आहे. इतिहास कालीन हे लाकडी दरवाजे आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही दरवाज्यांच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाज्यांमधून आत प्रवेश केल्यानंतर आपणास दोन्ही बाजूला तटबंदी केलेली दिसते व समोरच्या दिशेने उत्तराभिमुख दिशेने तिसरा दरवाजा दृष्टीस पडतो.

पाटबंधारे प्रकल्प, महत्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे – जिल्हा अमरावती

मेळघाट

मेळघाट मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगामध्ये वसलेले अभयारण्य आहे. या पर्वत रांगांना गाविलगड पर्वत रांग असंही संबोधलं जातं. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार या पाच नद्या वाहतात. त्या पुढे तापी नदीला जाऊन मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भांडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणं आहेत. विविध प्राणी, जैव संपदा आणि वनांनी समृद्ध असा प्रदेश आहे.

हिरवाईची चादर पांघरलेला आणि हिरवाईचाच गालीचा अंथरलेला हा प्रदेश दूरवर पसरलेल्या ऊंच ऊंच पर्वत रांगा आणि खोल दऱ्यांनी श्वास रोखून धरायला लावतो. ऊंचावरून कोसळणारे धबधबे, विस्तीर्ण पसरलेली नैसर्गिक तळी मनाला मोहून टाकतात. पावसाळ्यात तर ढग हातावर उतरल्यासारखे वाटतात. गुगामल राष्ट्रीय उद्यान (३६१.२८० चौ.कि.मी), मेळघाट वन्यजीव अभयारण्य (७८८.७५० चौ.कि.मी), नरनाळा वन्यजीव अभयारण्य (१२.३५० चौ.कि.मी), वान वन्यजीव अभयारण्य (२११.००६ चौ.कि.मी) आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य (१२७.११० चौ.कि.मी) असे क्षेत्र मिळून मेळघाट व्याघ्र प्रकल्प अस्तित्त्वात आला आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहात असून इतर समाजाचेही लोक राहातात.

येथे पट्टेवाला वाघ, बिबटे, रानगवे, सांबर, भेकर, रानडुकर, वानर, चितल, नीलगायी, चौसिंगा, अस्वल, भूईअस्वल, रानमांजर, तरस, कोल्हे, लांडगे, ससे यासारख्या प्राण्यांबरोबरच कृष्णमृग, उडत्या खारी, मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुर बगळा, करकोचे, बलाक, बदके, ससाणे, सर्पगरूड, पारवे, बुलबूल असे पक्षी देखील आहेत. या अभयारण्यात सागाची झाडं विपूल प्रमाणात आहेत. मेळघाट जंगलाला कौतुकाने किपलिंग प्रदेश असे संबोधण्यात येते. सातपुडा-मैकलचा हा प्रदेश खोल दऱ्या आणि ऊंच पर्वत रांगांनी बनलेला आहे.

चिखलदरा

चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हे शहर याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदऱ्यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.

चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही.कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते.

पर्यटन स्थळे भिमकुंड (किचकदरी), वैराट देवी, सुर्यास्‍त पॉईंट, बिर धरण, पंचबोल पॉईंट, कालापाणी धरण, महादेव मंदिर, हरिकेन पॉईंट, मोझरी पॉईंट, प्रोस्पेक्ट पॉईंट, देवी पॉईंट, गोराघाट, शंकर तलाव, मालविय आणि सुर्यास्ताचे पॉईंट, सरकारी उद्यान, संग्रहालये, धबधबे, धाराकुरा, बकादरी, पंचधारा धबधबे, गाविलगढ किल्ला

सेमाडोह

सेमाडोह हे सिपना नदीजवळील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील दाट जंगलात धारणी तहसील, जिल्हा अमरावती मध्ये वसलेले एक गाव आहे. त्या मध्ये चार वसतिगृह (६0 बेड ) आणि दहा कॉटेज (२0 बेड )आहे. कॉटेजेस अलीकडेच नूतनीकरण केल्याने चांगल्या स्थितीत आहेत. उपहारगृहाच्याच पुढे संग्रहालय आहे.

कौंडण्यपूर

कौंडण्यपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक गाव आहे, ज्याला पौराणिक विदर्भ राज्याची प्राचीन राजधानी कुंडिनापुरीचे ठिकाण मानले जाते. कौंडण्यपूर ही महाभारतात नमूद केलेल्या विदर्भ राज्याची राजधानी आहे. रुक्मिणी हरणाची घटना येथे घडल्याचे मानले जाते. श्रीकृष्णाने येथे थोडा वेळ विश्रांती घेतली आणि वर्धा नदीचे (वरदायिनी नदीचे सध्याचे नाव) पाणी प्याले. येथे विठ्ठल आणि रुख्मिणीचे प्रसिद्ध मंदिर आहे. राज्य पुरातत्व विभागाने कौंडण्यपूर येथे उत्खनन करून "त्याची पुरातनता तपासली". खोदकामात प्राचीन शहराच्या तटबंदीच्या खुणा आढळून आल्या. "एडीवी 14व्या किंवा 15व्या शतकातील, बहुधा एक राजवाडा वास्तू वाटणाऱ्या दगड, पाया आणि विटांच्या भिंती देखील सापडल्या आहेत," असे अहवालात म्हटले आहे.

मंदिरातील एक माहिती फलक असेही म्हणतो की ताम्रयुगीन आणि पाषाणयुगातील अवशेष कौंडण्यपूर येथे सापडले आहेत. हैदराबाद गॅझेटमध्येही या ठिकाणाच्या प्राचीन स्वरूपाचा उल्लेख आढळतो. टेकडीवर वसलेले प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीचे दर्शन घडवते. काहींच्या मते कार्तिक महिन्यात रुक्मिणी कौंडण्यपूरला आपल्या माहेरच्या घरी येत असे. कौंडण्यपूर मंदिरापासून जवळच असलेल्या अंबा देवीच्या दुस-या मंदिरापर्यंत एक बोगदा असल्याचेही मानले जाते. जिथून रुक्मिणी भगवान कृष्णासोबत पळून गेली असे मानले जाते.

गुरूकुंज आश्रम मोझरी

तुकडोजी महाराज [पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे, (१९०९-१९६८)] अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी त्यांचे नाव बदलून तुकडोजी असे केले. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.

विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती.

रिद्धपूर

रिद्धपूर हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात चांदूर बाजार-मोर्शी रोडवर वसलेले आहे. रिद्धपूर हे महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे आणि देशभरात ‘महानुभव पंथाच्या अनुयायांची काशी’ म्हणूनही ओळखले जाते. आषाढी पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा आणि गोविंद प्रभू जयंती (ऑगस्ट-सप्टेंबर) रोजी हजारो यात्रेकरू रिद्धपूरला भेट देतात. याशिवाय या पवित्र स्थानाला दररोज मोठ्या संख्येने भाविक भेट देतात.

पाटबंधारे प्रकल्प, महत्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे – जिल्हा गडचिरोली

बिनागुंडा

बिनागुंडा हे भामरागड तालुक्यात वसलेले आहे. बिनागुंडा-कुओकोडी ऐतिहासिक गावे आहेत. हा भाग अबुजमादमध्ये येतो. या भागामध्ये राहणा-या आदिवासींना बडा माडिया म्हणतात. हा 7-8 गावांचा समूह आहे ज्यामध्ये 140 कुटुंबे आहेत. बिनागुंडा गावात पोहोचण्यासाठी, आपल्याला अहेरी-आलपल्ली-भामरागड-लाहेरी आणि त्यानंतर बिनागुंडा-कुओकोडीकडे जावे लागेल. अंतर गडचिरोली पासून आणि चंद्रपूर पासून 210 किमी दूर आहे. आदिम जनजाती बांबू कटिंग आणि तेंदू पत्ता संकलनाद्वारे मिळविलेल्या मजुरीवर गुजराण करतात. ते लागवडीची शेती करीत असे. त्यांचे अस्तित्व जंगलावर प्रामुख्याने आहे. सदर ठिकाण शहरापासून दूर आहे आणि साध्या पद्धतीचे येथील ग्रामीण लोकांचे जीवनमान आहे. विविध सोयी सुविधे चा अभाव आहे. हे ठिकाण धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. बिनागुंडा हे तालुक्यापासून 40 कि.मी. अंतरावर पूर्वेस आहे. सदर गाव हे महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर वसलेले आहे. या डोंगरावर पश्चिमेकडील अबुझदचा पर्वत आहे. 4 कि.मी. अंतरावर कुव्वाकोडी हे गाव डोंगराच्या टोकावर स्थित आहे. भामरागड येथे विश्रामगृह उपलब्ध असून ते गडचिरोली पासून 160 किमी. अंतरावर आहे.

सुरजागड आणि पेठा

एटापल्ली तालुक्यात सुरजागड टेकडी वसलेली आहे. सदर टेकडी 27 कि.मी. दूरवर पसरलेली आहे. त्याला सुरजागड पहाडी म्हणून ओळखले जाते.

या टेकड्यावर विविध प्रकारची वनस्पती आणि प्राणी आहेत. प्रदेशातील दाट जंगल आणि हिरवीगार पालवी ट्रॅकर्सना आकर्षित करतात. परिसरात दगडी लोखंडाच्या समृद्ध खाणी आहेत. या क्षेत्रातील लोखंडाच्या खनिजांचा वापर करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या पर्वतीय क्षेत्रातील फुलपाखरांची प्रजाती देखील पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यातील ऋतूमध्ये लहान धबधबे आणि पूर आलेल्या नद्या प्रदेशात छान देखावा निर्माण करतात. माडिया समाज हा सुरजागड पहाडीच्या गावात राहतो. सेवा समिती या गावात एक दवाखाना चालवते. या गावाजवळ चंद्रखंडी हे एक सुंदर ठिकाण आहे. हे गाव पेठापासून 2 कि.मी. अंतरावर आहे.

भामरागड संगम

हे ठिकाण पामालगौतम, इंद्रावती व पर्लाकोटा या नद्यांच्या संगमाच्या काठावर वसलेले आहे. पावसाळा या ऋतूमध्ये वरील नद्यांचे विस्तृत पाणी पसरत असते. हे ठिकाण त्याच्या हिरव्यागार आणि घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे.आपण येथे माडिया संस्कृती पाहू शकतो. येथे अस्वल,हरीण आणि इतर वन्य प्राणी अनेकदा आढळू शकतात. येथील संगमावर सूर्यास्ताच्या वेळेस भेट देण्यासाठी एक आनंदाची बाब असते. येथे नदीच्या काठावर बांधकाम विभागाचे विश्राम गृह बांधलेले आहे.

निवासस्थान: वन विश्रामगृह आणि बांधकाम विधाग विश्राम ग्रह, भामरागड गडचिरोली पासून अंतर: 180 किमी दक्षिणेस आहे.

लक्का मेटा

लाक्षागृह साठी प्रसिद्ध, निसर्ग वारसा एक चमत्कार. कथासंग्रहानुसार, महाभारत काळात पांडवांनी लाक्षागृह मध्ये आश्रय घेतला होता. अहेरी तालुक्यात, अलापल्ली-सिरोंचा रोडवर, रेपनपल्ली गावापासून 4 कि.मी. अंतरावर दाट जंगला मध्ये, लाक्षागृह वसलेले आहे. जेव्हा कौरवांनी लाक्षागृहमधल्या पांडवांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कौरवांनी लाक्षागृहला जाळले. परंतु हे गृह नैसर्गिक घटकांच्या मदतीने स्थापित असल्याने बरेच दिवस हे गृह जळत राहिले आणि पांडवांची त्यातून सुटका झाली. पांडवांनी त्यातून बाहेर येण्यासाठी गुप्त मार्ग वापरला जो एक तलावात उघडत होता. लाक्षागृहच्या विटा, लपविलेले मार्ग, सरोवर हा सत्याचा साक्षी आहे. हे डोंगरावर आहे आणि सकाळी लवकर तेथे जाणे आवश्यक असते कारण तेथे जाण्याकरिता एकच अरुंद मार्ग आहे. भेट देण्यास अनुकूल हंगाम: पावसाळी हंगाम वगळता संपूर्ण वर्ष.

वडधम जीवाश्म पार्क

वडधम जीवाश्म पार्क हे महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील वडाधम या गावाजवळ असरअल्ली मार्गावर वसलेले आहे. सदर ठिकाण दक्षिणेकडे गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 189 कि.मी. अंतरावर स्थित आहे. सिरोंचा या तालुक्याच्या ठिकाणापासून 19 कि.मी. अंतरावर आहे.

हौशी पुरातत्त्वतज्ज्ञांच्या एका गटाने विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद्यांनी प्रभावित झालेल्या सिरोंचा तालुक्यामधील वडधम या गावाजवळ प्राचीन असलेल्या अवशेषांचा शोध लावला आहे. सदर अवशेष, त्यांनी लाखो वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा केला आहे आणि हे प्राचीन अवशेष डायनासोर या प्राण्याचे मानले जातात. सिरोंचाचा देशातील पाच ठिकाणात समावेश आहे, जेथे डायनासॉरचे जीवाश्म मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. 1959 मध्ये तेलंगाना राज्याच्या सीमेजवळ असलेल्या कोथापल्ली-पोचमपल्ली या गावात गोदावरीच्या खो-याजवळ एक पूर्ण वाढ झालेला डायनासॉरचा सापळा सापडला. तेव्हापासून, सदर जीवाश्म कोलकातामधील एका संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

चपराला

हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तहसीलमध्ये स्थित आहे. गडचिरोली जिल्ह्यात चपराळा हे अतिशय लोकप्रिय आणि धार्मिक स्थळ आहे. हे प्रशांत धाम या नावानेही ओळखले जाते. सन 1935 च्या सुमारास कार्तिक स्वामी महाराजांनी हे मंदिर बांधले. आता ते भगवान शिव, साईबाबा आणि हनुमान, दुर्गा, आणि इतर देवी-देवतांच्या मंदीरांचे समूह बनले आहे. या ठिकाणाला नेहमीच पर्यटक भेट देत असतात व नेहमी पर्यटकांची गर्दी असते. हे प्राणहिता नदीच्या काठावर आहे. हे वर्धा आणि वैनगंगा नदीचे एक ‘संगम’ स्थान आहे आणि प्राणहिता नदीचे उगमस्थान आहे. नदीचे खोरे सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर आहे. नदीचे पात्र रूंदीमध्ये असल्याने नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. हे क्षेत्र चपराला वन्यजीव अभयारण्य अंतर्गत येते. येथे अनेक जंगली जनावरे आढळतात. अभयारण्यात वन्यजीव सुद्धा आढळतात. अभयारण्यमध्ये वाघ, चित्ता, जंगली मांजरी, अस्वल, जंगली कुत्री, हिरण, सांबार आणि इतर अनेक प्राणी आढळतात.अभयारण्य मुख्य वनसंरक्षक व वन आणि क्षेत्रीय संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प यांच्या नियंत्रणाखाली येते.उद्यानास भेट देण्याचा सर्वोत्तम काळ फेब्रुवारी ते मे महिन्यात असतो.

वन वैभव

आलापल्ली वनवैभव गडचिरोली जिल्ह्यात आहे. हे ठिकाण आल्लापल्ली पासून 16 कि.मी. अंतरावर असून सन 1935 मध्ये स्थापन करण्यात आलेले स्थायी संरक्षण क्षेत्र आहे. या प्लॉटचे क्षेत्र सुमारे 6 हेक्टर आहे.

या प्रदेशाची जैवविविधता फार चांगली असून अतिशय वृद्ध आणि सरळ वाढणारे वृक्ष येथे जतन केले जाऊ शकतात. वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य प्रजातीसह विविध फुलझाडे पहायला मिळतात. पर्यावरणीय व्यवस्थेची देखभाल स्वाभाविकपणे केली जात असल्याने येथे शैवाल, बुरशी, किडे आणि मकरस्यांच्या विविध प्रजाती दिसतात. या क्षेत्राशी संलग्न मेडपल्ली तलाव असून पर्यावरणातील विविध घटक पर्यटक आणि संशोधकांचे आकर्षण ठरले आहे. येथे साग या प्रजातीचे सर्वात उंच झाड असून त्याची उंची 39.70 मीटर एवढी आहे. सर्वात मोठ्या वृक्षाची उंची असलेल्या झाडाचा घेर 5.27 मीटर आहे. भेटीचा सर्वोत्तम हंगाम: ऑक्टोबर ते फेब्रुवारी.

मार्कंडा देव

मार्कंडा देव हे भगवान शिवाचे लोकप्रिय स्थान आहे आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील धार्मिक व्यक्तींसाठी महत्वाचे स्थान आहे. सदर ठिकाण हे चामोर्शी उपविभागातील चामोर्शी तहसील अंतर्गत येते. येथील लोकसंख्या सुमारे 1000 आहे. हे गाव वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे.

मार्कंडा गाव चंद्रपूरपासून 65 कि.मी. तर नागपूरपासून 184 कि.मी. अंतरावर आहे. गडचिरोली पासून 40 किलोमीटर अंतरावर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मुल पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या शहरातून येथे येण्याकरीता वर्षभर बस सेवा उपलब्ध आहे. गडचिरोली / मार्कंडाला सर्वात जवळचे रेल्वे स्थानक मुल येथे आहे.

लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा

लोकबिरादरी प्रकल्प (एलबीपी) हा महाराष्ट्र सेवा समिती, वरोरा जि. चंद्रपूर द्वारे एक सामाजिक उपक्रम म्हणून राबविल्या जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत रुग्णालय, शाळा व पशु अनाथालय चालविल्या जाते. 23 डिसेंबर 1973 रोजी सामाजिक कार्यकर्ते मा. बाबा आमटे यांनी माडिया गोंड यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे या प्रकल्पाचे कार्य सुरु केले. सदर प्रकल्प गडचिरोली जिल्हा मुख्यालया पासून 160 कि.मी. अंतरावर आहे व आल्लापल्ली पासून 60 कि.मी. दूरवर आहे. डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांना कम्युनिटी लीडरशिपसाठी 2008 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पाटबंधारे प्रकल्प, महत्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे - जिल्हा गोंदिया

नवेगाव राष्ट्रीय उद्यान

हे उद्यान गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला वसलेले आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात स्थित असुन क्षेत्रफळ 133.78 चौ.कि.मी आहे. निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या उद्यानाला अत्यंत महत्व आहे. या उद्यानाची नैसर्गीक संपत्ती खरंच अतुलनीय आहे. इथल्या नयनरम्य दृश्यांची, शुद्ध आणि ताजी हवा यांचा आनंद उपभोगण्याकरीता नवेगाव येथे भेट देणे आवश्यक आहे. जैवविविधता संरक्षण करण्याच्या दृष्टिने देखील या उद्यानात प्रचंड क्षमता आहे. या राष्ट्रीय उद्यानात कोरड्या मिश्र जंगलापासून ते ओलसर वनापर्यन्त विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. नवेगाव उद्यानात पक्ष्यांच्या 209 प्रजाती, 9 प्रजाती सरीसृप आणि 26 सस्तन प्रजाती आहेत ज्यात वाघ, बिबळ्या वाघ, जंगली मांजर, कस्तुरी मांजर, पाम कॅव्हेट, लांडगा इ. यांचा समावेश आहे. उद्यानामध्ये व्याख्यान केंद्र, लहान संग्रहालय आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध आहेत. वन्यजीव निरीक्षण आणि छायाचित्रीकरण करणेकरीता उद्यानात सात वॉच केबिन आणि पाच वॉच टॉवर्स आहेत.

या राष्ट्रीय उद्यानात नवेगावबांध तलावाचे क्षेत्रफळ 11 चौ. कि.मी आहे. अठराव्या शतकात कोलु पटेल कोळी यांनी हा तलाव बांधले होता, अशी आख्यायिका आहे. सध्या, कोलासूर देव या नावाने ओळखल्या जातो आणि त्यांचा पुतळा देखील तलावाच्या सभोवताल एक शिखरावर आढळतो.

नागझिरा अभयारण्य

नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात असून “हिरवा ओएसिस” चे चमत्कारिकरित्या जतन करुन ठेवले आहे. जैव-विविधता संवर्धन या दृष्टिकोनातून देखील या अभयारण्याला अत्यंत महत्व आहे. हे अभयारण्य, निसर्गरम्य परिसराने, विलासीत हिरव्या वनस्पतींसह सुशोभित केले आहे. हे वन्यजीव अभ्यारण्य, निसर्गाची अनमोल संपत्ती असून, निसर्गरम्य सुंदरतेचा, शुद्ध आणि ताज्या हवेचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी भेट देणे आवश्यक आहे. आपल्या राष्ट्रीय परंपरेचा एक भाग म्हणून संरक्षण करणे आवश्यक आहे. जैव-विविधता संवर्धनाच्या दृष्टिने देखील या अभयारण्यात अफाट क्षमता आहे. हे अभयारण्य, मध्य भारतात विशेषतः विदर्भातील महत्वाचे संवर्धन केंद्र आहे. हे मानवी वसाहती करीता “हरित-फुप्फुस” प्रमाणे कार्य करते आणि पर्यावरण संतुलन राखण्यास सहाय्यक असे आहे.

हे अभयारण्य अनेक लुप्त होत असलेल्या प्राण्यांचे घर आहे. येथे पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये मासे, 34 प्रकारचे सस्तन प्राणी, स्थानिक आणी स्थलांतरित जमीन व पाण्यात वावरणा-या पक्षांच्या सुमारे 166 प्रजाती, सरपटणा-या प्राण्यांच्या सुमारे 36 प्रजाती आणि 4 उभयचर प्रजाती आहेत. हे अभयारण्य पक्ष्यांच्या वास्तव्याकरीता लक्षणीय स्थान आहे आणि पक्षी पाहणाऱ्यांकरीता नंदनवन आहे.

कचारगढ

कचारगढ हे गोंदियापासून 55 कि.मी अंतरावर आहे. येथे प्रसिद्ध 25000 वर्ष जुन्या नैसर्गिक गुहा असल्यामुळे पर्यटकांचे हे लोकप्रिय स्थळ आहे. येथे पुरातन वस्तूशास्त्रज्ञांना दगडांचे शस्त्र सापडले आहेत, जे त्या काळातील लोक उपयोग करीत होते . हे घनदाट जंगलात वसलेले असून ट्रॅकिंग करीता उपयुक्त असे स्थळ आहे. स्थानिक रहीवासी यांचे साठी पूजेचे हे स्थान

हाजरा फॉल

हाजरा फॉल, सालेकसा तहसील येथील एक प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. हे दरेकसा रेलवे स्टेशन पासून 1 किमी अंतरावर आहे. येथे पर्यटक निसर्गरम्य परीसराचे आनंद घेऊ शकतात. हे स्थळ शिबिर आणि ट्रेकिंग साठी देखील सुविधाजनक आहे. सभोवताली घनदाट जंगल आणि टेकड्यां मुळे येथे मनमोहक दृश्य पहावयास मिळते. हा गोंदिया आणि डोंगरगढ रेल्वे स्थानकां दरम्यान मुंबई-हावडा मुख्य मार्गावर आहे.

पाटबंधारे प्रकल्प, महत्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे – जिल्हा चंद्रपूर

महाकाली मंदिर

महाकाली मंदिर हे चंद्रपूर मधील एक प्रमुख मंदिर आहे. चंद्रपूरवाशी लोकांच्या हृदयात याला महत्त्वाचे स्थान आहे. या मंदिरात मुख्य देवता महाकाली माता आहे. सामान्यतः एप्रिल महिन्यात यात्रेकरूंची गर्दी होते. विशेषतः हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला एप्रिल महिन्यामध्ये आयोजित वार्षिक महोत्सवात लाखो लोक या प्रसंगी मंदिरास भेट देतात. महाकाली मंदिरात दोन मूर्ति आहेत. एक उभी मूर्ति म्हणजे लाल, पिवळा आणि नारंगी रंगाचे कापड असलेली मुख्य मूर्ती. दुसरी मूर्ती मूळ जागेच्या खाली आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी, एका विशिष्ट प्रकारच्या सुरंगामधून चालणे आवश्यक आहे.

पिण्याचे पाणी, निवास आणि प्रसाद वितरण सर्व सुविधा मंदिर परिसरात उपलब्ध आहेत. मंगळवार हा या मंदिरात पूजेचा सर्वात प्रमुख दिवस मानला जातो.

भद्रावती जैन मंदिर

शहरातील हे मंदिर जैन समुदायामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. हे अतिशय सुंदर शिल्प आहे. हे मंदिर चंद्रपूर शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर भद्रावती तालुक्यामध्ये आहे. हे मंदिर अतिशय पुरातन असल्याचे म्हटले जाते, परंतु अचूक कालावधी माहीत नाही. येथे खोदलेल्या ठिकाणी अनेक प्राचीन मूर्ती आढळलेल्या आहेत.

किल्ले

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात वसलेले हे तीन किल्ले (बल्लाळपूर, चंद्रपूर आणि माणिकगड किल्ले) मूलतः आदिवासी आहेत.

चंद्रपूर किल्ला

गोंड राजा किल्ला 15 व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या दरम्यान आणि 16 व्या शतकाच्या सुरुवातीला गोंड राजांनी बांधला होता. राजा व सैन्य यांचे शत्रूपासून रक्षण करणे हा किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश होता. बाबजी बल्लाळ यांनी किल्ला बांधणे सुरू केले परंतु 1597 मध्ये मृत्युपश्चात धुंड्या राम साह यांनी काम केले.

या किल्ल्याची तटबंदी सुमारे 7.5 मैल परिसरात आहे. जेव्हा गोंड राजधानी बल्लाळपूर ते चंद्रपूर येथे हलविली गेली तेव्हा बल्लाळ राजांनी उंच भिंती आणि बुरुज असलेल्या एक प्रचंड जमीन किल्ला बांधला. किल्ल्याची तटबंदी 15-20 फूट आहे. किल्ल्याचे क्षेत्र उत्तरेस जाटपुरा, पश्चिमेला विंबा किंवा घोडे मैदान, दक्षिण बाजूला पठानपुरा आणि पूर्वेकडील महाकाली किंवा अचलेश्वर मध्ये विभागलेले आहे. किल्ल्यामध्ये चार-पाच दरवाजे आहेत.

चंद्रपूर पासून या किल्ल्यापर्यंत नियमित खाजगी आणि राज्य परिवहन बस सेवा तसेच ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत.

माणिकगढ किल्ला

9 व्या शतकात आदिवासी नागा राजे यांनी मानिकगड किल्ला बांधला होता. जवळच्या एका नव्या सिमेंट कारखानाने प्रसिद्ध केलेले मानिकगढ हे चंद्रपूरचे दक्षिण-पश्चिम 35 किलोमीटरवर आहे. 9 व्या शतकात आदिवासी नागा राजांनी तयार केलेला हा मानिकगड किल्ला समुद्र पातळीपेक्षा 507 मीटर उंचीवर आहे. किल्ल्याला भिंती आणि बुरुज यांच्यासह मजबूत तटबंदी होती. आज, हा किल्ला संपूर्ण अवशेषांत आहे. जवळच विष्णूचे जुने मंदिर आहे. किल्ला भग्नावस्थेत पडलेला आहे आणि फक्त अवशेष आहेत. त्याची उध्वस्त भिंत आणि बुरुज त्यावेळची मजबूत तटबंदीची चिन्हे दर्शवतात.

बल्लाळपूर किल्ला

बल्लाळपूर किल्ला चंद्रपूरमध्ये 16 कि.मी. खांडक्या बल्लाळशाह याने वर्धा नदीच्या पूर्वेकडील बेटावर बांधला. किल्ल्याच्या भिंती आणि बुरुजाचा आकार चौकोनी आहे. किल्ल्याची भिंत अद्याप अखंड आहे, परंतु सर्व प्राचीन वास्तू संपूर्णतः अवशेषांत आहेत. नदीच्या दोन्ही बाजुला उजव्या कोनावर दोन अखंड दरवाजे आहेत.

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प मध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य समाविष्ट आहे. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हा भारतातील 28 व्याघ्रप्रकल्पांपैकी एक आहे. राष्ट्रीय उद्यान क्षेत्र 623 चौ किमी आहे. नॅशनल पार्कचे नाव स्थानिक आदिवासी देव “तारू” यावरून पडले आहे तर जंगलातुन वाहणा-या अंधारी नदीचे नाव अभयारण्याला देण्यात आले आहे. या ठिकाणचे मुख्य आकर्षण म्हणजे वाघांची उपस्थिती आहे. चितळ आणि सुबक सांबर चे मोठे कळप अनेकदा जंगलात दिसतात. इतर आकर्षणामध्ये चपळ असणाऱ्या भयानक भोवराचा समावेश आहे. भव्य गौर, मजबूत नीलगाय, लाजाळू स्लॉथ बीअर, जंगली कुत्री, सर्वव्यापी जंगली सुपीक आणि गुंतागुंतीचे तेंदुआ इत्यादी. रात्रभर लहान शिडाच्या पात्रात पनीर शिबेट, रॅटल, फ्लाइंग गिलहरी त्यांची उपस्थिती जाणवते. प्रसिद्ध रामदेगी मंदिराच्या पार्श्वभूमीवर,ताडोबामध्ये निसर्ग सौंदर्य सर्वोत्तम आहे.

विंजासन टेकडी

येथे अनेक मंदिरे आहेत जी फार आकर्षक आहेत. येथे वातावरण अतिशय प्रसन्न आणि शांत आहे आणि या ठिकाणाच्या धार्मिक तसेच वातावरणाच्या शांततेचा लाभ घेण्यासाठी येथे येता येऊ शकते.

जुनोना लेक

हे ठिकाण चंद्रपूर शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. येथे, नौकाविहारासाठी सुविख्यात सुविधा आहेत तसेच रेस्टॉरंट्स आणि पार्क्स आहेत.

घोडाझरी लेक

हा तलाव नागभीड तालुक्यात आहे. हे चंद्रपूर शहरापासून 106 कि.मी. अंतरावर तसेच नागपूर पासून – 97 कि.मी. वर आहे. नागपूर – चंद्रपूर महामार्गापासून 6 किमी अंतरावर आहे.

आनंदवन आश्रम, वरोरा

“आनंदवन आश्रम” च्या स्थानामुळे वरोरा नगराला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोक बिरादरी आणि सोमनाथ प्रकल्प ही केंद्रे, लोकोपयोगी सेवा समिती चालविते. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता श्री बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी व काळजी घेण्यासाठी त्यांची सेवा आणि प्रयत्न केले आहेत. मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक अनेकदा आनंदवन आश्रमला भेट देतात.

वरोरा गावात स्थित आनंदवन आश्रम चंद्रपूर शहरापासून ४६ किलोमीटर अंतरावर आहे. 1951 मध्ये बाबा आमटे यांनी त्याची स्थापना केली. मूलतः हा एक आश्रम असून, हे केंद्र मुख्यतः कुष्ठरोगग्रस्त रुग्णांसाठी एक समुदाय पुनर्वसन केंद्र म्हणून कार्य करते. समाजातील दुर्बल घटकांपासून ते अपंगांना हे केंद्र मदत करते. आश्रमात असंख्य छोट्या प्रमाणावर गृहउद्योग आधारित उद्योग आहेत. रहिवाशांकडूनच चालविलेले हे केंद्र व त्यातून मिळणारे उत्पन्न आश्रमाच्या अतिरिक्त गरजांची पूर्तता करते.

पाटबंधारे प्रकल्प, महत्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे - जिल्हा बुलडाणा

संत गजानन महाराज मंदीर, शेगाव

श्री” गजानन महाराजांचे समाधी मंदिर मध्यभागी असून परिसराच्या ‘ उत्तर व पश्चिम ‘ दिशेस दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत. अवघ्या ३२ वर्षांच्या अवतारकार्याव्दारे आध्यात्मिक जगतात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या संत सत्पुरुष “श्री” नी १९०८ साली, त्यांच्या अवतार समाप्तीचे संकेत देताना ” या जागी राहील रे ” असे सांगत ज्या ठिकाणी निर्देश केला त्याच जागेवर आज “श्री” चे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले आहे. “श्री” च्या समक्ष व संमतीने निर्माण झालेल्या या समाधी मंदिराच्या भुयारात जिथे श्री. हरी पाटलांनी शिला ठेवली होती तिथे “श्री” ची संजीवन काया “समाधिस्थ” आहे. संतांजवळ सर्व जातीपंथाचे भक्त अमन शांती मिळावी म्हणून जातात. “श्रीं” चे समाधी मंदिर अत्यंत आकर्षक अशा संगमरवरी बांधणीतून घडविलेले असून थेट दर्शन तसेच श्री मुखदर्शनाव्दारे भक्तजनांना आपल्या आराध्य दैवताचे अलौकिक रूप पाहता येते. समाधी मंदिराच्या बाहेरील बाजूस नानाविध देवीदेवतांची अप्रतिम शिल्पे कोरण्यात आली आहेत.

आनंद सागर, शेगाव

आनंद सागर हे महाराष्ट्राच्या शेगांव गावातील मनोरंजन केंद्र आहे. हे केंद्र श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे सुमारे ३५० एकर जमिनीवर शेगांव येथे येणाऱ्या भक्तांसाठी आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत तसेच स्वस्तात जेवण मिळण्याची सोय आहे. खुल्या थिएटरमध्ये दररोज संध्याकाळी ध्वनिप्रकाश प्रदर्शन होते. येथे मत्स्यालय आणि छोटी रेल्वेगाडीही आहे. तसेच तिथे ध्यान मंदिर आहे. नजरेतही साठविता न येणारे, उत्कृष्ट कलाकृतींच्या अजोड कारागीरीने मन थक्क करणारे असे आनंदसागरचे भव्य प्रवेशद्वार. आनंदसागर या मनोहारी उद्यानाचा पाया अध्यात्मिक वारसा व उच्च वैभवशाली हिंदु संस्कृतीवर आधारीत आहे हे आपणांस पावलोपावली जाणवते.

संत मंडप - प्रवेशव्दारातून खाली येताच समोर आनंदसागर परिसराचे विस्तीर्ण क्षेत्र दिसते. आजुबाजूस गर्द झाडी, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, कारंज्यातून उसळणारे व लयबध्द स्वरात झुळझुळणारे पाणी सोबत घेऊनच आपण विस्तीर्ण अशा संतमंडपात प्रवेश करतो. या अर्धवर्तुळाकार, भव्य अशा संतमंडपात १८ राज्यातील १८ संतांच्या प्रतिमा स्थापन केल्या आहेत.

झुलता पुल - निसर्ग व मानव एकत्र आल्यावर काय घडू शकते यांचे प्रत्यंतर पाहावयाचे असेल तर द्वारकाबेटाकडे आपणांस नेणारा झुलता पुल पाहावांच लागेल. स्वामी विवेकानंद ध्यानकेंद्र - अमुर्त तत्वाला चिरंजिवित्व बहाल करुन निर्माण होऊ घातलेल्या ‘आनंदसागर ‘ या पृथ्वीवरील नंदनवनाच्या अद्वितीय कलाकृतीचा परमोच्च बिंदू म्हणजे स्वामी विवेकानंद ध्यानकेंद्र.

मत्स्यालय - भारतात आढळणाऱ्यां शोभीवंत माशांच्या विविध प्रजाती तसेच मोठे मासे, कासव आदि या मत्स्यालयात पहावयास मिळतात. बालोद्यान - येथे लहानच काय तर मोठ्यानांही क्षणभर आपले वय विसरुन खेळण्यातला आनंद लुटावासा वाटतो व क्षणभर ‘बालपण‘ मुक्तपणे उपभोगावसं वाटतं. ॲम्पी थिएटर - देशातील काही मोजक्याच ठिकाणी आढळणाऱ्या खुल्या रंगमंचापैकी एक रंगमंच आनंदसागरच्या परिसरामध्ये उभा राहिला आहे. अद्यावत ध्वनी व प्रकाशयोजना तसेच विस्तिर्ण रंगमंच लाभलेला हा अ‍ॅम्पी थिएटरचा परिसर लक्षात राहतो तो त्याच्या भव्यतेमुळे.

राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सिंदखेड राजा

जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते.

जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे.

राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात झाली होती त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत. यासोबतच साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो, त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.

मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून, विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे. मोतीतलावाबरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे, त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्या द्वारे केल्या जात होता. या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे.

लोणार सरोवर

लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्केमुळे झाली. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. हे खाऱ्या पाण्याचे आणि अल्कधर्मी सरोवर आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.

सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे.

अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजीकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.

ज्ञानगंगा अभयारण्य

ज्ञानगंगा अभयारण्यातील घनदाट जंगल बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ भागात वसलेले आहे. अभयारण्य सुंदर गवताळ प्रदेशाने संपन्न आहे आणि सामावलेले दोन तलाव त्याला सुशोभित करतात, ज्याचा उपयोग वन्यजीवांच्या मुख्य जलस्रोताच्‍या स्वरूपात होतो.

अभयारण्य बुलढाणा शहरापासून केवळ ८ कि.मी अंतरावर असून खामगाव शहरापासुन २० कि.मी अंतरावर आहे. अभयारण्याला त्याचे नाव नजीक असेलेल्या ज्ञानगंगा नदीमुळे प्राप्त झाले. लगत असलेले ज्ञानगंगा सरोवर व पलढग सरोवर अभयारण्याची शोभा वाढवतात, पावसाळा वगळता वर्षभर संपूर्ण वनसंपदा पाण्याकरिता  याच दोन तलावांवर अवलंबून असते, हे सगळे केवळ २०५ चौ.किमी च्या आत सामावले आहे.  अभयारण्यात प्रामुख्याने बिबट,अस्वल, भेकर, नीलगाय, चितळ, तडस, रानमांजर यांचे अस्तित्व आहे जवळ-जवळ १५० पक्षी प्रजातींना अभयारण्य आश्रय देते ज्यामध्ये स्थानिक व स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा समावेश आहे. अभयारण्यास भेट देण्याची योग्य वेळ जानेवारी ते जून ही आहे कारण वन्यप्राण्यांचे विलोभनीय दर्शन फेब्रुवारी ते मे या कालावधीत होते.

राजूर घाट

शहराला लागून असलेल्या बुलढाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाट निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून परिसरातील असलेल्या विविध मंदिरे, नदी, नाल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

अजिंठ्याच्या डोंगरात वसलेल्या बुलढाणा शहर परिसराला अलौकिक सौंदर्याची देण असल्यामुळे तसेच थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात येथूनच जिल्ह्याचा कारभार सुरू केला होता. दरम्यान स्वातंत्र्यानंतर बुलढाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा मिळाला. आज रोजी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी शहर परिसरात असलेले नैसर्गिक सौंदर्य दरवर्षी परिसरातील पर्यटक प्रेमींना खुणवत असते.

राजूर घाटात एका वळणावर संकटमोचन हनुमान मंदिर आहे. या ठिकाणाहून बुलढाणा शहर परिसर तसेच राजूर घाटातील डोंगराचे सौंदर्य निहाळता येते. त्यानंतर मोताळा तालुक्यातील राजूर गावाकडे जाताना घाटातच दुर्गामाता मंदिर आहे.

या परिसरात खोल दरीतील पाणी साठवलेला नाला, सर्वत्र डोंगराने पांघरलेला हिरवा शालू तसेच मोताळा शहरासमोर असलेल्या नळगंगा धरणाचे पाण्याचे विशाल पात्र निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घातले. या ठिकाणाहून सूर्योदय तसेच सुर्यास्तचे दर्शन घेताना वेगळी अनुभुती मिळते. त्यानंतर मोहेगाव समोर तालुका पर्यटन केंद्र तसेच त्यापुढे जमिनीखाली १५ फुट खोल असलेले महादेवाचे मंदिर आहे. या परिसरात नळगंगा नदीचे वाहणारे पाणी, परिसरातील हिवराई मनाला सुखावून जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात बुलढाणा शहर परिसरातील अजिंठ्याच्या डोंगरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना हाक देत असते.

पाटबंधारे प्रकल्प, महत्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे - जिल्हा भंडारा

अंबागर किल्ला

मध्ययुगीन काळातील हा किल्ला तुमसर तालुक्यात येतो. किल्ला सुमारे 1700 ए डी मध्ये देवगड चा शासक, बख्त बुलंद शाह यांचा सुभेदार राजा खान पठाण यांनी बांधला होता. नंतर तो नागपूर राजा रघुजी भोसला यांच्या ताब्यात आला, जो बंदी साठी तुरुंग म्हणून वापरला नंतर त्यावर ब्रिटिशांनी कब्जा केला होता.

आंधळगाव

आंधळगाव हे आंधळगाव किंवा गड गाव असेही ओळखले जाते. भंडारा तालुक्यात सुमारे 16 मैल अंतरावर एक गाव आहे. जिल्ह्यातील प्रमुख केंद्रांपैकी एक आहे, ज्यामध्ये एक मोठा वीण उद्योग आहे, मुख्यतः स्त्रियांसाठी रेशीमच्या साड्या उत्पादीत होतात. इथला कोसा (रेशम) कापड सुप्रसिद्ध आहे

चोडेश्वरी देवी

भंडारापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेले मोहाडी येथे हे मंदिर आहे. नवरात्रीमध्ये अनेक यात्रेकरू येतात. भंडाराचे पर्यटन स्थळ म्हणून हे ठिकाण घोषित करण्यात आले आहे.

कोका वन्यजीव अभयारण्य

2013 मध्ये कोका यांस वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली. हे उद्यान भंडारा पासून फक्त 20 किमी अंतरावर आहे आणि नागझिरा वन्यजीव अभयारण्याजवळ आहे. उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 92.34 चौ किमी आहे. कोकामध्ये वाघ आणि बिबट्यांची संख्या जास्त आहे. गोरस, चित्ता आणि संभारसारखे वन्यप्राणी आहेत. कोका वन्यजीव अभयारण्याने नागझिरा व न्यू नागझिरा अभयारण्यापासून दूर पळून जाणाऱ्या प्राण्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थानाची भूमिका बजावली. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. येथून कोकासाठी ट्रेन, बस आणि कॅब उपलब्ध आहेत. जवळचे रेल्वे स्थानक 20 किलोमीटर दूर भंडारा आहे. जंगल सफारी सकाळी 6:30 ते 10.30 आणि संध्याकाळी 3:00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत चालतात. 44 कि.मी. लांबीचा मार्ग आणि कव्हर करण्यासाठी सुमारे 3-4 तास लागतात. पार्क गुरुवारी बंद असतो. उद्यानाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ हा नोव्हेंबर आणि जून महिन्यांच्या दरम्यान असतो. भाड्याने वाहने उपलब्ध नाहीत. पर्यटकांना आपले स्वतःचे वाहने आणण्याची आवश्यकता आहे. गाडीसाठी भंडारा मधील वन अधिका-याकडून परवानगी घेण्याची आवश्यकता आहे.

पाटबंधारे प्रकल्प, महत्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे - जिल्हा यवतमाळ

कळंब येथील चिंतामणी गणेश

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश! गणेशोत्सवासंदर्भात एक विशेष सूत्र असेही आहे की, हा उत्सव जागतिक स्तरावर सर्वांत मोठा उत्सव म्हणून सुविख्यात आहे. महाराष्ट्रातील २१ गणेश क्षेत्रांपैकी एक आणि विदर्भातील अष्ट गणेशांपैकी एक म्हणजे कळंब येथील श्री चिंतामणी ! चिंतामणीची ही मूर्ती साक्षात् इंद्रदेवाने स्थापिली आहे. चिंतामणी गणेश मंदिर गावाच्या भू-पातळीपासून ३३ फूट खोल आहे. गाभा-यात उतरण्यासाठी चिरेंबदी दगडाच्या २९ पाय-या आहेत. खाली उतरल्यावर पाण्याचे एक चिरेबंदी अष्टकोनाकृती कुंड आहे. मुख्य गाभा-यात चिंतामणी गणेशाची साडेचार फूट उंचीची विलोभनीय आणि नयनरम्य मूर्ती विराजमान आहे. ती मूर्ती दक्षिणाभिमुखी आहे.

महर्षि गौतम ऋषींनी इंद्रदेवास शापमुक्त होण्यासाठी विदर्भातील कदंबक्षेत्री जाऊन श्री गणेशाची तपश्चर्या करण्यास सांगितलेले ते हेच कळंब, तथा इंद्राच्या घोर तपश्‍चर्येने प्रकट झालेले श्री गणेश येथेच ! इंद्रास शापमुक्त करणारा चिंतामणी, गणेश भक्तांना चिंतामुक्त करणारा होय. देवराज इंद्रानेश्री गणेश पूजनास्तव पृथ्वीजल न वापरता प्रत्यक्ष स्वर्गातून श्री गंगेला आवाहन करून त्या पाण्याने श्री पूजन केले आणि प्रत्येक १२ वर्षांनी श्री गंगेस श्रीचरण धुत रहाण्यास सांगितले. त्यानुसार प्रत्येक १२ वर्षांनी येथील कुंडातील पाण्याची पातळी वाढते आणि श्री चिंतामणीचा पदस्पर्श झाला की पाण्याची पातळी आपोआप न्यून होऊ लागते. अशा घटना वर्ष १९१८, १९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३, १९९५ या वेळी अनुभवास आल्या.

सहस्त्रकुंड धबधबा

सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्यात मोडतो. हा धबधबा उमरखेड पासून ४५.५ किलो मीटर वर तर जिल्हा मुख्यालयापासून १६१ कि.मी. अंतरावर आहे. पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसते. ३० ते ४० फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याचे एकसुरी आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो. सहस्रकुंड धबधब्याच्या काठावर पर्यटकांसाठी बगीचा तयार करण्यात आला आहे. बागेत विविध रंगाची फुलपाखरे पर्यटकांना मोहिनी घालतात. धबधब्यात मनसोक्त भिजल्यानंतर या बगीच्यात विश्रांती करत धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्याचा आनंद काही औरच. तेलंगणातील अदिलाबाद जिल्हा या धबधब्यालगत असल्याने या पर्यटन स्थळाला तेथील पर्यटकांची जास्त गर्दी दिसते. धबधब्याच्या काठावर असलेले पंचमुखी महादेव मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. पावसाळी पर्यटनात सहस्रकुंड परिसरात पक्षी आणि वन्य प्राण्यांचे वैविध्य पहावयास मिळते.

टिपेश्वर अभयारण्य

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यामधील  यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत  विखुरलेले आहे. हिरव्यागार वनराई मध्ये जवळपास १४८.६३ चौ.कि.मी. मध्ये अभयारण्य व्यापलेले आहे. उंच डोंगराळ व द-या खोऱ्यांचा भाग असल्या कारणांमुळे याठिकाणी विविध जातीच्या वनस्पती आढळून येतात. तसेच घनदाट जंगल क्षेत्र असल्या कारणांनी  वेगवेगळे जंगली पशु पक्षी यांचा नेहमी वास असतो. वाघ, चितळ, सांबर, काळवीट, कोल्हा, अस्वल, मोर, माकड, नीलगाय, जंगली मांजर इ. प्रकारचे प्राणी या अभयारण्यात आढळून येतात. पर्यटनासाठी उत्कृष्ट कालावधी – एप्रिल-मे

पाटबंधारे प्रकल्प, महत्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे - जिल्हा वाशिम

पोहरादेवी मंदिर

संत सेवालाल महाराज मंदिर – पोहरादेवी
वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पोहरादेवी येथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. संत सेवालाल महाराजांना देशभरातील १२ कोटी जनता मानते.

संपूर्ण देशभरातील १० – १२ लाख बंजारा भाविक श्री. राम नवमी यात्रेकरिता या ठिकाणी येतात. संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी येऊन नतमस्तक होतात. या ठिकाणी दर्शन घेतात. नवस फेडतात.

शिरपुर जैन मंदिर

हा परिसर महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यांतर्गत आहे. गावाच्या मध्यभागी तीन पदरी मंदिर आहे. यामध्ये श्री 1008 अंतरीक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मूर्ती जमिनीच्या वरच्या जागेत विराजमान आहे जे या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यामध्ये इतर 16 वेद्या आहेत. सर्व वेदीवर दिगंबर तीर्थंकरांच्या मूर्ती विराजमान आहेत. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शिरपूर, जैन-काशी या ठिकाणी २४ तीर्थंकरांचे एक मोठे मंदिर बांधले जात आहे. विशेष म्हणजे ओडिशातून इथे आलेले ४०० कारागीर अहोरात्र घाम गाळून हे अध्यात्मिक महान स्मारक उभारत आहेत. स्थानिक पारस बागेत हे कारागीर संगमरवरी दगडांवर आपली अप्रतिम कारागिरी दाखवत आहेत. श्वेतांबर जैन पंथाने विदर्भात बांधलेले हे सर्वात मोठे मंदिर असेल. त्याची उंची 150 फूट असेल. या मंदिरात सर्व २४ जैन तीर्थंकरांच्या मूर्तींना अभिषेक करण्यात येणार आहे.

श्री क्षेत्र कारंजा

थोर दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान म्हणून करंजनगरी वा कारंजा या शहराची प्रसिद्धी आहे. श्री वासुदेवानंदसरस्वती व श्री ब्रह्मानंदसरस्वतीस्वामी यांच्या प्रयत्नाने श्रीगुरूंच्या या जन्मस्थानाची महती सर्व दत्तभक्तांना पटलेली दिसते. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मूर्तिजापूर-यवतमाळ या रेल्वेरस्त्यावर कारंजा हे स्टेशन आहे. साठ सत्तर हजार लोकसंख्येच्या या गावी चांगली बाजारपेठ असून गुरुमंदिरामुळे दत्तभक्तांनाही ते प्रिय झाले आहे. प्राचीन काळातही या क्षेत्राचे महत्त्व वर्णन केले आहे. करंजमुनींनी या ठिकाणी पाण्यासाठी तलाव खणण्यास सुरुवात केल्याची कथा आहे. या क्षेत्रात गंगा व यमुना यांचे वास्तव्य बिंदुमती नावाच्या कुंडात असून येथून पुढे बेंबळा नदी वाहते. याच क्षेत्रात यक्षमाता यक्षिणी देवीचेही वास्तव्य असल्याचे सांगतात. करंजमुनींच्या प्रभावाने गरुडापासून शेषनागास संरक्षण येथेच मिळाल्यामुळे या क्षेत्रास ‘शेषांकित क्षेत्र’ असेही नाव आहे.

बालाजी मंदिर

तिरूपतीचा बालाजी म्हणजेच गिरीचा सावकार तर वाशीमचा बालाजी जहागिरदार अशी वाशीमच्या बालाजीची भारतवर्षात ख्याती आहे. भाविकांची श्रध्दा, पुराणकाल आणि मध्ययुगीन इतिहासातील दुवा सांधणारे, वास्तुशासाची वैशिष्टये दिमाखाने मिरवणारे वाशीमचे श्री बालाजी संस्थान आजही जनार्दन विष्णू मुर्तीच्या रूपाने पुरातन वत्सगुल्म नगरीची आणि भव्य देवालयाच्या रूपाने मध्ययुगीन वाशीम नगरीच्या इतिहासाची वैभवशाली साक्ष देत उभे आहे. वाशीमच्या हृदयस्थानी असलेले वाशीमचे बालाजी संस्थान पुरातन इतिहास आणि मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास आपल्यासमोर जिवंत करते. जवळपास सव्वादोनशे वर्षापूर्वी वाशीम नगरीतील एक राजपूत स्त्री दिवंगत झाली. तिच्या अत्यंसंस्कारासाठी सध्याच्या चंद्रशेखर मंदिराजवळ एक खड्डा तयार करीत असतांना चंद्रशेखर व इतर मुर्ती सापडल्या. ही वार्ता परिसरात पोहचली. त्यावेळचे नवाब हसमतजंग बहादूर आणि येथील देशमुख , जमीनदार मंडळीने व गावक-यांनी सापडलेल्या मुर्ती पाहिल्या आणि तेथे आणखी खणावयास सांगितले. त्यातून बालाजीची विष्णू मूर्ती, लक्ष्मी, गणेश शारदा व अन्य मूर्ती अवतीर्ण झाल्या. वाजतगाजत या मुर्ती काटीवेस वरील हनुमान मंदिराच्या पारावर आणण्यात आल्या. देवालयाच्या बांधकामाला श्रावण शुध्द १३ शके १७०० म्हणजे ६ ऑगष्ट १७७८ ला सुरूवात झाली. देवालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिरात श्री बालाजी व इतर सापडलेल्या मुतीची प्राणप्रतिष्ठा मोठया समारभंपूर्वक श्रावण वद्य शके म्हणजे २२ ऑगस्ट १७८३ रोजी शुक्रवारला करण्यात आली. या मंदिराचे बांधकामाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्टये म्हणजे सुर्यनारायण बालाजीचे दर्शन व्हावे, यासाठी र्गभगृहाच्या मुर्तीच्या समोरील भिंतीत प्रवेशव्दाराच्या वरच्या बाजूला एक झरोका आहे. हे मंदिर पूर्वाभिमूख असून सुर्याने उत्तरायणात प्रवेश केल्यापासून ते दक्षिणायन सुरु होतो तो पर्यत म्हणजे डिसेंबर ते जून या काळात सुर्यकिरण मुर्ती वर पडतात.